मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळानं संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर शुक्रवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं एसटी कामगार संघटनांना दिले आहेत. न्यायालयानं संप न करण्याचे निर्देश दिले असतानाही कामगार संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळानं आज न्यायालयात अवमान याचिका सादर केली होती. एस.टी. महामंडळानं एकूण ३४३ जणांविरोधात अवमान केल्याबद्दल नोटीस जारी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. यात संपात सहभागी झालेल्या संघटनांचे नेते, पदाधिकारी तसंच इतर प्रमुख कामगारांचा समावेश आहे. महामंडळानं मंगळवारी ३७६ कामगारांवर निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी कुणाच्याही भाषणबाजीला बळी न पडण्याचं आवाहन एसटी कामगारांना केलं आहे. कामगारांच्या अन्य मागण्या मान्य केल्या आहेत. पण, एसटीचे राज्य सरकारमधील विलीनीकरणाची मागणी एक-दोन दिवसांत पूर्ण होण्यासारखी नाही, असही परब म्हणाले.