नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत हा देशांतर्गत विमान वाहतुकीची जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनला असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल एका कार्यक्रमात सांगितलं. देशाच्या आर्थिक विकासाला बळ देणारं महत्वाचं क्षेत्र म्हणून देशांतर्गत विमान वाहतुकीचा विकास होत आहे, असंही ते म्हणाले. नागरी हवाई वाहतुकीबाबतच्या ‘विंग्ज इंडिया’ या आशियातल्या सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते काल झालं. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या गावांना जगाशी जोडत असल्याचा हवाई वाहतूक क्षेत्राला अभिमान असून कोरोना काळात या क्षेत्रानं बजावलेली भूमिका विसरता येणार नाही, असं शिंदे यावेळी म्हणाले.