मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या काही भागात उद्या नगरपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदान होत असून त्यासाठीचा प्रचार काल रात्री थांबला. या निवडणूकांची मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे.  सांगली जिल्ह्यात कवठे महांकाळ, खानापूर आणि कडेगाव या तीन नगर पंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार असून प्रत्येक नगर पंचायतीच्या 13  जागांवर मतदान होईल.  इतर मागासवर्ग आरक्षण रद्द झाल्यामुळे त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून प्रत्येकी चार जागा याप्रमाणे बारा जागा उपलब्ध आहेत.  त्यासाठीचं मतदान 18 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर सर्व जागांची एकत्रित  मतमोजणी 19 जानेवारीला होणार आहे.अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि भातकुली या दोन नगरपंचायतींसाठीचं मतदानही होणार असून  तिवसा नगरपंचायत निवडणूकीसाठी ही निवडणूक महिला, बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ, देवगड-जामसंडे, वाभवे-वैभववाडी आणि कसई -दोडामार्ग या चार नगरपंचायतीसाठी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकिय पक्षांनी रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केल. चार नगर पंचायतीच्या या निवडणुकीत ५२ जागांसाठी १५४ उमेदवार रीगणात आहेत. दरम्यान निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून सर्वच नगर पंचायत कार्यक्षेत्रात पोलिसांचा  कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.