मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या आज ३४१व्या दिवशी देशानं १३९ कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. आजच्या दिवशी दुपारपर्यंत देशभरात लसींच्या ४७ लाखाहून अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. याबरोबरच देशात आजवर दिल्या गेलेल्या लसमात्रांची एकूण संख्या १३९ कोटी ४६ लाखाहून जास्त झाली आहे. यापैकी ५६ कोटी १२ लाखाहून जास्त जणांना लसींच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. राज्यातही कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या ५ कोटीहून अधिक झाली आहे. आत्तापर्यंत राज्यभरातल्या ५ कोटी १ लाखाहून अधिक नागरिकांना लसींच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. राज्यात आजच्या दिवसभरात दुपारपर्यंत लसींच्या ३ लाख ३८ हजाराहून अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत राज्यभरात एकूण १२ कोटी ९२ लाखाहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत.