मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य शासन पतहमी देणार आहे.

आतापर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ 7 हजार 866 जणांना मिळाला असून बँकेमार्फत 400 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. महामंडळांकडून 3 हजार 700 लाभार्थींना 10 कोटींचा व्याज परतावा केलेला आहे. उर्वरित लाभार्थींना व्याज परतावा देण्याचे काम सुरु आहे.

बँकामार्फत शेतीपूरक व्यवसायांकरिता कर्ज देताना अडचणी येत होत्या. त्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस अंतर्गत शेतीपूरक कर्जाला पत हमी देता येते.

शेती पूरक व्यवसायांसाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेच्या धर्तीवरच क्रेडिट गॅरंटी फंड्स फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायजेस आणि  क्रेडिट गॅरंटी फंड्स ट्रस्ट फॉर मायक्रो अँड मिडियम इंटरप्रायजेस या दोन्ही पत हमीच्या योजना यापुढील काळात महामंडळाच्या कर्जासाठी लागू  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळामार्फत सीजीटीएमएसई आणि सीजीएफएमयू या दोन्ही पत हमीच्या योजनांचे शुल्क बँकेत भरल्यावर त्याचा परतावा करण्यात येईल.

या निर्णयानुसार राज्य शासनामार्फत बँकांना 25 सप्टेंबर 2018 रोजी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस अंतर्गत घेतलेल्या कर्जावरील पत हमी देण्याकरिता मंजुरी देण्यात आली आहे.