नवी दिल्ली : देशाच्या सीमांचा इतिहास लिहिण्याच्या कामाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या प्रतिष्ठित व्यक्ती, नेहरू मेमोरियल संग्रहालय आणि ग्रंथालयाचे अधिकारी, पुराभिलेख महासंचालनालय, गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी 17 सप्टेंबर 2019 रोजी बैठक घेतली. नव्याने सीमांचा इतिहास लिहिण्याच्या या कामात सीमांशी संबंधित विविध पैलू समाविष्ट केले जातील. यात सीमांकन, सीमांचा बदल, सुरक्षा दलांची भूमिका, सीमावर्ती भागातल्या लोकांची भूमिका, त्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा समावेश असेल. असा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. हा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे.

भारतीय सीमांचा इतिहास लिहिण्याचे महत्व अधोरेखित करत राजनाथ सिंह म्हणाले की, यामुळे लोकांना, विशेषत: अधिकाऱ्यांना देशाच्या सीमांबाबत जाणून घेणे शक्य होईल.

सिंह यांनी विविध सूचनांचे स्वागत केले आणि अधिकाऱ्यांना यासाठी आवश्यक दस्तावेज आणि कार्यप्रणालीबाबत तज्ञांशी सल्लामसलत करण्याचे निर्देश दिले.