नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विविध भागात चिथावणीखोर आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी भाषणं केली जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचं भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी खंडन केलं आहे. या आरोपावरून सरकारला कोंडीत पकडणाऱ्या विरोधी पक्षांचे आरोप निराधार असल्याचं नड्डा यांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

गेल्या आठ वर्षांत भारतीय राजकारणात झपाट्याने बदल झाले असून, मतपेढीचं, फुटीरतावादी राजकारण आणि बुरसटलेला दृष्टिकोन आता कालबाह्य झालं आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या मंत्रानुसार कार्य करत असून त्यामुळे प्रत्येक भारतीय सक्षम झाला आहे, असं मत नड्डा यांनी व्यक्त केलं आहे.