मुंबई (वृत्तसंस्था) : कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भातील चंद्रपूर इथं काल राज्यातील सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली. विदर्भात आज आणि उद्या काही भागांत उष्णतेची लाट येईल तर ३ आणि ४ मे रोजी मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी ४२ तर काही ठिकाणी ४० अंशांच्या आसपास तापमान होतं. ६ मे पर्यंत पुणे परिसरात ४० अंशापर्यंत तापमान राहील. दरम्यान, चार मे पर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. मराठवाडा, विदर्भात कोरडे हवामान राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.