मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना कालावधीत राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागानं अतिशय चांगलं काम केलं. मात्र सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण करण्याची आवश्यकता असून त्या दिशेनं राज्य शासन काम करत आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्यावतीनं राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत पवार बोलत होते.

राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही आरोग्य विभागाच्या व्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल, असं अजित पवार यांनी सांगितलं.

तत्पूर्वी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं. महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनेत कालसुसंगत बदल करण्यासाठी सूचना द्याव्यात. या योजनेत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश करता येईल का, याबाबत विचार केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.