नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. जालोर इथं काल सर्वाधिक ४७ अंश, तर फलोदी, पिलानी आणि बिकानेर इथं ४६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जयपूर, जोधपूर, जालोर आणि सिरोहीमध्ये रात्रीचे तापमान ३० अंशांपेक्षा जास्त नोंदवलं गेलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये पुढील पाच दिवस विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पटनमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर आणि पलक्कड जिल्ह्यांना आज पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. रविवारपर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत केरळमध्ये जोरदार वाऱ्यासह ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.