नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षा अभियाना दरम्यान RPF अर्थात रेल्वे सुरक्षा दलानं अनेक अल्पवयीन मुलींसह १५० महिलांना मानवी तस्करीचा बळी होण्यापासून वाचवलं आहे.

तसंच महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करणाऱ्या ७ हजार हून अधिक पुरुषांनाही अटक केली आहे. या पथकानं रेल्वे प्रवाशांना त्यांच्या सुरक्षेबद्दल सजग करण्यासाठी ५ हजार ७४२ जागरुकता मोहिमा आयोजित केल्या आहेत. महिलांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी काय करावं आणि काय करू नये याचं मार्गदर्शनही वेळोवेळी देण्यात येत आहे.

मेरी सहेली या मोहिमे अंतर्गत महिला प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासासाठी वाढीव सुरक्षा दिली जात आहे. रेल्वेच्या २२३ स्थानकांमध्ये  RPF पथकांनी २ लाख २५ हजारांहून अधिक महिलांशी संवाद साधला आणि त्यांना सुरक्षा मिळावी याकरता प्रवासाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोबत केली.