मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या मराठवाडा – विदर्भ अशा मागास भागाला प्राधान्य देणारं सरकार आलं आहे, असं प्रतिपादन राज्याचे नवनियुक्त उप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपुरात केलं. डॉ .बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागपूरच्या आमदारांनी तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचं  स्वागत केलं त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असलेल्या आमदार निलंबन प्रकरणी माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, सर्वोच्च न्यायालयात योग्य ती  बाजू आम्ही मांडू. आम्ही योग्यच काम केलं असल्यामुळे निकाल देखील योग्यच येईल. मात्र प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्यावर आत्ता टिप्पणी करणं योग्य ठरणार नाही.