मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाच्या सणांवर महाराष्ट्रात बंदी येणार नाही असा मी शब्द देतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीनं आयोजित मुंबई मोरया गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात काल ते शिवाजी मंदिर इथं बोलत होते. गणेशाचे विसर्जन करताना भ्रष्टाचार नेहमी तळाशी राहिला पाहिजे असे मागणे मी मागितले असून आता सर्व हिंदू सण जोरात साजरे करूया असंही ते यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, विधान परिषदेतले भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर,‍ आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले नसते तर गणेशोत्सवावर, गोविंदावर निर्बंध आले असते. तसंच मुंबईतली सर्व गणेशोत्सव मंडळं नोंदणीकृत करण्याचं  काम भारतीय जनता पक्ष करेल असा विश्वास भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.