नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तळागाळापर्यंत शिक्षणाची सुविधा दिल्याने देशाचं उज्वल भविष्याची पायाभरणी होते असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. त्या आसाममध्ये चहाच्या बागा असलेल्या भागांत १०० आदर्श उच्च माध्यमिक शाळांची पायाभरणी करताना बोलत होत्या.

राष्ट्रपती दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत.त्यांनी आज गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या मंदिरात देवीचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली, आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा आणि इतर मान्यवर होते. त्यांनी आज आसाम मधल्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ आणि पायाभरणी केली. ३ हजार आदर्श अंगणवाडी केंद्रांचं दुरस्थ पध्दतीनं उद्घाटन त्यांनी केलं.

सिलचर इथं तेल उत्पादनांचा पुरवठा आणि वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या इंडिअन ऑईल लिमिटेडचे तेल साठवणूक केंद्र आणि गुवाहाटीनजीक अत्याधुनिक मालवाहतूक केंद्राची पायाभरणीही राष्ट्रपतींनी केली.राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक विभागांचे उद्घाटनही त्यांनी केलं.

नागालँड आणि मेघालयाला जोडणाऱ्या रेल्वेगाडीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला ही पॅसेंजर गाडी नागालँडमधल्या शोखुवी ते लुमडिंग मार्गे मेघालयातल्या मेंदीपठार या दरम्यान धावणार आहे.