मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीत आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळानं यंदा राज्यभरात १ हजार ४९४ अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

२१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान या बस धावणार असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. सर्व प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा, असं आवाहनही चन्ने यांनी केलं आहे.

दरम्यान, एसटी महामंडळानं ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन चन्ने यांनी केलं आहे.