मुंबई (वृत्तसंस्था) : भारतातील महिला उद्योजकांचं प्रमाण १४ टक्के असून, ते ३० टक्के पर्यंत  वाढवण्याचा आमचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितलं. ते आज पुण्यात फिक्कीच्या महिला आघाडीनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेच्या उद्घाटन समारंभात  बोलत होते. राणे पुढे म्हणाले की, महिलांचा उद्योग क्षेत्रातील सहभाग वाढवून  शहरी आणि ग्रामिण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. अनेक विदेशी गुंतवणुकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करायला उत्सुक असल्याचं सांगितलं. यावेळी फिक्कीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंती दालमिया आणि पुण्याच्या फिक्की महिला आघाडी आयोजक निलम सेवलेकर तसंच इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते.