नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासी बांधवच या देशाचे मुळ निवासी आणि मालक असून काँग्रेस पक्ष सदैव आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज वाशिम जिल्ह्यात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हजारो वर्षापूर्वी देशात जंगल मोठ्या प्रमाणात होतं, आज ते नष्ट होत आहे पण जंगलाचं रक्षण आदिवासी बांधवांनीच केलं. देशाच्या जमिनीवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा त्यांना आदिवासी मानत नाही, वनवासी संबोधून त्यांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. काँग्रेस सरकारनं आदिवासींच्या हक्कासाठी निर्णय घेतले. पण आदिवासी, दलित, वंचित, अल्पसंख्याक समाजाला त्यांचे हक्क मिळू नयेत अशी भाजपाची भूमिका आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आदिवासी समाजाच्या न्याय, हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले आणि वयाच्या २४ व्या वर्षी शहिद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत, असं ते म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आदिवासी बांधवांचे हक्क काँग्रेसच देऊ शकते. त्यासाठी काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे आणि राहुल गांधी प्रधानमंत्री झाले पाहिजेत. देशाचं संविधान, तिरंगा सहीसलामत रहावा यासाठीच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे, असही ते म्हणाले. यावेळी राज्याचे प्रभारी एच के पाटील, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय आदिवासी विभाभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, इत्यादी उपस्थित होते.