नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व सामान्य नागरिक पैशांची बचत करुन पैसे पतसंस्थांमध्ये ठेवत असतात. पतसंस्था अवसायनात निघाली तर सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पतसंस्थांचे कडक लेखा परिक्षण करावं आणि गैरव्यवहार आढळल्यास कडक कारवाई करावी, असे निर्देश सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज सातारा इथं दिले. त्यांनी सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ज्या सहकारी बँका आणि पतसंस्था अडचणीत आहेत त्यांची तपासणी करुन ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी सहकार विभागानं कार्यवाही करावी अशी सूचना सावे यांनी केली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यायलाही त्यांनी सांगितलं.