मुंबई (वृत्तसंस्था) : सीमाप्रश्नी कर्नाटक सरकार दररोज दादागिरी करत आहे. पण त्यापुढं महाराष्ट्राचं राज्य सरकार मात्र बोलत नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज नागपूरच्या विधानभवन परिसरात बातमीदारांशी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही कर्नाटककडून जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकली जात आहे. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही अशा वल्गना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई करत आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे पण केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आजही महाविकास आघाडीनं शिंदे फडनवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कर्नाटकच्या दादागिरी विरोधातही बोम्मईचा सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. नागपुरातलं भूखंड प्रकरण, महापुरुषांचा अपमान या मुद्द्यांवर, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशाही घोषणा देण्यात आल्या.