नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात अतिगरिबी १ टक्क्यापेक्षा कमी झाली आहे, असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे. ते आज चंद्रपूर इथं आयोजित विजय संकल्प सभेत बोलत होते. कॉंग्रेसच्या राज्यात दिल्लीतून १ रुपया पाठवल्यावर सामान्य माणसापर्यंत केवळ १५ पैसेच पोहोचत होते, ८५ पैसे मध्येच गायब होत होते, असं खुद्द तेव्हाच्या प्रधानमंत्र्यांनी म्हटलं होतं. पण नरेंद्र मोदींच्या राज्यात ते दिल्लीत १ बटण दाबतात, अन् ११ कोटी ७४ लोकांना १५ सेकंदात पैसे पोहोचतात,  कारण हा डिजिटल इंडिया आहे, असं ते म्हणाले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, जलजीवन मिशन, उज्वला योजना, किसान सन्मान योजना अशा कार्यक्रमांद्वारे सरकारनं गरीब, महिला, आणि शेतकऱ्यांना बळ दिलं आहे. देशातल्या ४० टक्के लोकांना गंभीर आजारांशी लढण्यासाठी ५ लाख रुपये देण्याची व्यवस्था केली आहेत. या योजनेचा मुकाबला जगात कुणीच नाही करू शकत. कारण जेवढ्या लोकांना आपण ही सुविधा दिला आहे. त्याच्यापेक्षा अनेक देशांची लोकसंख्या कमी आहे, असं नड्डा म्हणाले.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार, आमदार भाजपा कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.