नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आगामी काळात रस्त्यांच्या माध्यमातून भारताचा विकास होणार आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर जिल्ह्यात विरारमध्ये  जनसंवाद कार्यक्रमात बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील येणारा काळ हा भाजपाचा असेल तेव्हा या जिल्ह्याचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, जे गेल्या ७५ वर्षात झालं नाही ते आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या काळात आपण करून दाखवलं आहे. कारगिलच्या खाली आशियातील सर्वात मोठा बोगदा आम्ही बांधत आहोत. आपला देश जगाचा विश्व गुरू बनला पाहिजे, जगातील महाशक्ती बनला पाहिजे, सर्वांचं कल्याण झालं पाहिजे याच संकल्पनेतून काम करण्याचं आवाहन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केलं.