मुंबई : केरळ मधील शबरीमला येथे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यात्रेकरू हंगाम सुरू असणार आहे. मुंबईमधून देखील मोठ्या संख्येने यात्रेकरू शबरीमला येथे जात असतात. या यात्रेकरूंनी सुरक्षित प्रवासासाठी अधिकृत व तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या प्रवासी वाहनांतूनच प्रवास करावा, असे आवाहन मुंबई (मध्य) चे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

मुंबई येथून शबरीमला येथे जाण्यासाठी रस्ते मार्गाने यात्रेकरू प्रवास करतात. हा प्रवास करताना ट्रक व इतर मालवाहतूक वाहनातून प्रवास करणे बेकायदेशीर व धोकादायक आहे. तसेच अनधिकृत वाहने व तांत्रिकदृष्ट्या रस्त्यावर चालण्यास योग्य नसलेल्या वाहनातून प्रवास केल्याने अपघात होण्याची संख्या जास्त असते. त्यामुळे प्रवाशांनी स्वतःची काळजी घेत जागरूक राहून प्रवास केला पाहिजे. प्रवास करताना यात्रेकरूंनी रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास त्यांचा प्रवास नक्कीच सुरक्षित होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी कळविले आहे.