मुंबई : सामाजिक न्याय विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत असलेल्या ज्योतीला अभिवादन करण्याचा कार्यक्रम येथील कुपरेज-ओवल मैदान येथे झाला.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, राज्यमंत्री अविनाश महातेकर आणि महाराष्ट्र विधानपरिषद मुख्य प्रतोद विजय (भाई) गिरकर, आमदार राज पुरोहित, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच प्रस्तावित कामांचा पाहणी दौरा केला. यावेळी स्मारकाच्या बाजूचा परिसर सुशोभित करणे, भव्य प्रवेशद्वार तसेच स्मारकासमोरील बगीचाला भगवान बुद्ध शांती उद्यान नाव देण्याचे प्रस्तावित असून या ठिकाणी भव्य तिरंगा उभारण्यात येणार असल्याचे श्री. खाडे यांनी सांगितले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर मान्यवरांनी प्रकाश टाकला.