मुंबई : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांच्या निधनाने एक कुशल, सहृदयी आणि परिपक्व राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, श्रीमती दीक्षित यांनी सलग तीनवेळा मुख्यमंत्री म्हणून कामकाज सांभाळताना दिल्लीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांना जनमानसात विशेष स्थान प्राप्त झाले होते. एक कुशल संघटक आणि प्रशासक हीदेखील त्यांची ओळख होती.

महिलांच्या समस्यांविषयी विविध पातळ्यांवर त्यांनी आवाज उठवला. विशेषत: संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिलांविषयक आयोगावर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी महिलांच्या समस्या जगासमोर प्रखरतेने आणल्या. खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशा विविध भूमिकांमधूनही त्यांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे राहिले.