नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संय़ुक्त राष्ट्रापुढे आज अनेक प्रश्न असून आत्मपरिक्षणाची गरज असल्याची स्पष्टोक्त्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करत होते. विश्व कल्याणाच्या उद्धेशाने संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली, मात्र आज समोर असलेली आव्हानं वेगळी आहेत, असं ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेनंतर तिसर जागतिक युद्ध झालं नसलं तरी अनेक लहान-मोठी युद्ध तसंच दहशतवादी हल्ले सुरु राहणं ही चिंतेची बाब असल्याचं  मोदी यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रांबाबत भारतात असलेला विश्वास जगातल्या इतर देशात तेवढ्याच तीव्रतेने आढळतो असं नाही, असं ते म्हणाले.

भारताची परिस्थिती मजबूत असतानाही जगाला कधीही त्रास झाला नाही. भारताने आजवर कायम जगाच्या कल्याणाचाच विचार केला असून अनेक शांतता प्रकियामध्ये आपले सैनिक पाठवल्याचं प्रधानमंत्र्यानी यावेळी सांगितलं.

गेले अनेक महिने जग कोरोनाशी झुज देत असाताना भारतानं सुरु केलेलं आत्मनिर्भर भारत अभियान संपूर्ण जगाला बळ देईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. महिलांना दिलं जात असलेलं आर्थिक सहकार्य आणि त्यांच्या संक्षमीकरणासाठी देशभर होत असलेल्या प्रयत्नाचाही मोदी यांनी आपल्या संबोधनात उल्लेख केला.

जगाच्या कल्याणासाठी आपण सगळ्यांनी समर्पित भावनेनं काम करण्यासाठी कटीबंध होऊया असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्य देशाना केलं आहे.