नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला.

भारताची पहिल्या डावातली १३१ धावांची आघाडी भरुन काढण्यासाठी फलंदाजीला उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ, ७० धावांची आघाडी घेऊन, २०० धावात तंबूत परतला. मोहम्मद सिराजनं तीन, जसप्रित बुमराह, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन, तर उमेश यादवनं एक गडी बाद केला.

भारतानं दुसऱ्या डावात दोन गडी गमावत विजय खेचून आणला. शुभमन गिल ३५, तर अजिंक्य रहाणे २७ धावांवर नाबाद राहीले. पहिल्या डावात शतकी खेळी करणारा रहाणे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत एक – एक अशी बरोबरी साधली आहे.