नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतासाठी खेळताना १३० कोटी भारतीय आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज आहेत ही भावना मनात राहूद्या असं आवाहन टोक्यो पॅरालिम्पिकला जाणाऱ्या भारतीय पॅराखेळाडूंना केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडास्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय चमूला आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी औपचारिक निरोप दिला. विविध ९ क्रीडाप्रकारांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी टोक्योला रवाना झालेला ५४ खेळाडूंचा हा चमू पॅरालिंपिकला जाणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय चमू आहे. ठाकूर यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या खेळाडूंना संबोधित केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रीय पर्यटन मंत्री जी. के. रेड्डी तसेच परराष्ट्र व्यवहार व सांस्कृतिक मंत्री मिनाक्षी लेखी यांनीही खेळाडूंना संबोधित केलं.