नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुग्ध व्यवसाय फक्त ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत नाही तर जगभरातल्या कोट्यवधी लोकांना उपजीविकेचं साधन देतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नाॅयडा इथं सांगितलं. आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनचच्या शिखरपरिषदेचं उद्घाटन त्यांनी केलं. त्यावेळी ते बोलत होते.

विकसित देशांपेक्षा वेगळ्या असलेल्या भारतीय दुग्धव्यवसायाची ताकद छोटे शेतकरी आहेत, असं त्यांनी सांगितलं.  भारताचा दुग्धव्यवसाय हा मोठ्या उत्पादनापेक्षा जनतेच्या उत्पादनासाठी ओळखला जातो, या पूर्ण साखळीत कोणी मध्यस्थ नाही आणि ग्राहकांकडून जो पैसा मिळतो त्यातला ७० टक्कयाहून जास्त शेतकऱ्यांच्या खिशातच जातो असं ते म्हणाले.     आज भारतात दुग्धव्यवसायात जे मोठं सहकाराचं जाळं आहे त्याचं उदाहरण जगभरात सापडणं अवघड असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

या सहकार चळवळीमुळे २ लाखाहून अधिक गावातून सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांकडून दिवसातून दोन वेळा दूध गोळा केलं जातं आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जातं, अशी माहिती त्यांनी दिली.  या व्यवसायात ७० टक्के महिला शक्ती आहे. या व्यवसायात महिलांचं प्राबल्य आहे. भारतात 2014 मध्ये 146 मिलियन टन दूध उत्पादन घेतलं जात होतं ते आता 210 मिलियन टनापर्यंत पोचलं आहे.  ही 44 टक्केची वाढ ही आमच्या सरकारने दुग्धव्यवसाय क्षेत्राचे सामर्थ्य वाढवण्यासाठी निरंतर काम केलं त्याचं फलित आहे. या वाढीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नदेखील वाढलं आहे.  भारत दुग्धव्यवसायाचा सर्वात मोठा डेटाबेस तयार करत आहे. पशुआधार हा गुरांच्या बायोमेट्रीक ओळख नोंदवणारा प्रकल्प आकाराला येत आहे , असं त्यानी सांगितलं.

पोषण आणि उपजीविकेसाठी दुग्धव्यवसाय ही या चार दिवसीय परिषदेची संकल्पना आहे.  ५० देशातले पंधराशे लोक या परिषदेत सहभागी  होत आहेत.