नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार नऊ वर्षं पूर्ण करत आहे. याबद्दल प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांचे आभार मानले आहेत. सरकारनं देशासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय देशातल्या सर्वसामान्य जनतेचं जीवन सुधारण्याच्या उद्देशानं घेतला जात असून त्यांचं सरकार विकसित भारताच्या निर्माणासाठी अधिकाधिक प्रयत्न करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी  ट्विट संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज त्यांच्या ट्विट अकाउंटवर एका वेबसाईटच्या लिंकचं उदघाटन केलं आहे. या साईटवर गेल्या नऊ वर्षातल्या देशाचा विकास प्रवास मांडला आहे. देशवासीयांनी या संकेतस्थळावर जाऊन  सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा सामान्य नागरिकांना कसा लाभ मिळत आहे हे पहावं, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. २०१९ मध्ये आजच्याच दिवशी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या  भाजप सरकारनं दुसऱ्या कार्यकाळासाठी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती.