नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभर महाजनसंपर्क अभियान राबवणार असून, त्याद्वारे ८० कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अभियानात केंद्रीय मंत्री, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी असे २२७ प्रमुख नेते लोकसभेच्या सर्व मतदारसंघांमधे प्रवास करणार आहेत. उद्या अजमेर इथं होणाऱ्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेनं या अभियानाला प्रारंभ होणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं. ३० जूनपर्यंत चालणाऱ्या या महाजनसंपर्क अभियानात प्रत्येक लोकसभा मतदार संघात समाजातल्या प्रभावशाली व्यक्ती, पद्म पुरस्कार, खेल पुरस्कार आणि इतर महत्वाचे पुरस्कार प्राप्त व्यक्ती अशा सुमारे साडेपाच लाख मान्यवरांना ‘संपर्क ते समर्थन’ या कार्यक्रमाअंतर्गत व्यक्तिगत भेटून त्यांच्यापर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोचवली जाणार आहे. या अभियानादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुमारे १२ सभा  आयोजन केल्या जातील, २३ जूनला जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या ‘बलिदान दिनी’ मोदी देशभरातल्या १० लाख बूथवर ऑनलाईन सभेनं संबोधित करतील, अशी माहिती तावडे यांनी दिली.