नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वकिलांनी गरीब आणि वंचितांना मोफत कायदेशीर मदत करण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. ओडिशातल्या कटक इथं राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. वकिलांनी आपल्या उत्पन्नाचा काही भाग गरीब आणि वंचितांच्या उन्नतीसाठी खर्च केला पाहिजे, कायदेशीर बाबींची माहिती नसलेल्या व्यक्तींना कायदेशीर व्यवस्थेचा लाभ मिळवून देणं वकिलांचे कर्तव्य आहे, असं त्या यावेळी म्हणाल्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व अनेक नामवंत वकिलांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे महान वकील नव्हते पण त्यांनी नेहमीच गरीब लोकांना कायदेशीर बाबींमध्ये साथ दिली, असंही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी सांगितलं.