मुंबई : धुळे जिल्ह्यातील कल्पेश आणि प्रियंका देवरे या नवविवाहित दाम्पत्याने नोंदणी पद्धतीने विवाह करुन लग्न समारंभाच्या आयोजनात वाचविलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस दिली आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मदत म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २ लाख ५१ हजारांचा धनादेश सुपुर्द केला.

बोरीस (ता. जि. धुळे) येथील प्रगतशील शेतकरी परशुराम भाईदास देवरे यांचे सुपुत्र कल्पेश आणि उंभरे (ता. साक्री, जि. धुळे) येथील प्रगतशील शेतकरी संजय काशिनाथ सोनवणे यांची कन्या प्रियंका यांचा विवाह निश्चित करण्यात आला. त्यावेळी वर-वधू आणि दोन्ही बाजूच्या कुटुंबियांनी खर्चिक समारंभाचे आयोजन टाळण्यावर सहमती दर्शवली. साधेपणाने विवाह करुन वाचवलेला पैसा, राज्यातील सध्याच्या दुष्काळ निवारण कार्यासाठी मदत म्हणून देण्याचा निश्चय करुन नोंदणी पद्धतीने विवाह लावण्यात आला.

कल्पेश आणि प्रियंकासह त्यांच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात आज (दि. ४) भेट घेऊन २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला. माजी आमदार प्रा. शरद पाटील या कुटुंबियांसमवेत उपस्थ‍ित होते. समाजासमोर घालून दिलेल्या या आदर्शाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नव दाम्पत्याचे तसेच देवरे आणि सोनवणे कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे.