नाशिक : मुंबई आणि पुण्यासोबत नाशिक जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्ण त्रिकोण पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

नाशिक जिल्ह्याची आढावा बैठक आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ , कृषीमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, हेमंत टकले, मौलाना मुक्ती, सरोज अहिरे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, नितीन पवार, नरहरी झिरवाळ, सुहास कांदे, माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, डॉ.राहुल आहेर, दिलीप बनकर,  मुख्य सचिव अजोय मेहता,  कृषी सचिव एकनाथ डवले, जलसंपदा सचिव आय. एस. चहल, उर्जा सचिव असिमकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मालेगाव तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल  व मालेगावच्या सर्वांगिण विकासावर भर देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. येत्या काळात या संदर्भातील कार्यवाहीला गती देण्यात येईल. राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक येथील उपकेंद्राची कार्यवाही करण्यासंदर्भात एक आठवड्यात निर्णय घेऊन त्याचा शासन निर्णय काढण्यात येईल. नदीजोड प्रकल्प, पाणी आरक्षण प्रश्नांबाबत स्वतंत्ररित्या बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत लोकप्रतिनिधींमार्फत आलेल्या सुचनांचा निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आदिवासी भागातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना वाळु पुरवठा करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मनमाड पाणी प्रश्न सोडविण्यासाठीदेखिल आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नाशिकमधील नांदुर मधमेश्वर पक्षी अभयारण्यास नुकताच रामसर हा आंतरराष्ट्रीय पर्यटन पाणथळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नाशिकमधील इतरही पर्यटन केंद्रांचा विकास करण्याच्यादृष्टीने संबधित पर्यटन केंद्राना येत्या काळात प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे श्री.ठाकरे म्हणाले.

शेती उद्योगाला चालना देण्यासाठी निफाड येथील ड्रायपोर्ट बाबत लवकरच आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल. जनतेच्या समस्या व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी विभागीय बैठका घेण्यात येत आहे. या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विविध समस्या मांडल्या. त्या संदर्भातील कार्यवाही येत्या काळात करण्यात येईल व कार्यवाहीचा आढावादेखील घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.