नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :‌ जनतेनं विकासाला मत दिलं असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं.

प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवरुन त्यांना दिल्लीतल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीतल्या जनादेशाचा भाजपा आदर करत असल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे, तर पक्षाच्या पराभवाचा आढावा घेतला जाईल, असं पक्षाचे नेते मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे, तर, दिल्लीतला जनादेश म्हणजे समाजात दुफळी निर्माण करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना दिलेली चपराक आहे, असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटलं आहे.