नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येणार नसतील तर सर्व ११५ जागा स्वबळावर लढण्याची काँग्रेसची क्षमता आणि तयारी असल्याचं पक्षानं म्हटलं आहे.

पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन यांनी आज औरंगाबादमध्ये वार्ताहर परिषदेत याची माहिती दिली. नवीन प्रभाग रचनेबाबत काँग्रेस समाधानी नाही आणि यात हस्तक्षेपाच्या मागणीसाठी भारतीय निवडणूक आयोगाला पत्र देईल, असंही हुसैन यांनी सांगितलं.

महाविकास आघाडी एकत्र येऊन ही निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या निवडणुकीसाठी काँग्रेसचा वचननामा तयार केला जात असून त्यामध्ये ई कचरा, कर संकलन, पाणीपुरवठा आणि रस्त्यांची पायाभूत सुविधा या मुद्यांचा समावेश केला जाईल असं मुजफ्फर हुसैन यांनी सांगितलं.