मुंबई : राज्यात विविध रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली असलेल्या 105 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 4 जण दाखल असून मुंबईत 2 तर पुणे आणि नाशिक येथे प्रत्येकी 1 जण भरती आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या 496 विमानांमधील  59 हजार 654 प्रवासी तपासण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या नवीन सुचनेनुसार चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द.कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या 10 देशातील प्रवाशांसोबतच इराण आणि इटली या देशातील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 359 प्रवासी आले आहेत. पैकी 236 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 113 जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 108 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. इतर दोघांचे अहवाल आज प्राप्त होतील.