राज्यातील कोणताही पात्र लाभार्थी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासंदर्भात सदस्य किशोर दराडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर उपस्थित झालेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.

श्री.देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कर्जमाफी योजना शासन निर्णय दिनांक 28 जून 2017 अन्वये जाहीर केली. या शासन निर्णयानुसार रुपये 1.50 लाखावरील रक्कम पात्र शेतकऱ्यांनी भरावयची आहे. दिनांक 31 मे 2019 अखेर पर्यंत एकूण 1,95,614 शेतकऱ्यांनी रुपये 1.50 लाखावरील कर्जाची रक्कम भरली असलेले एकरकमी परतफेड योजनेचा लाभ रुपये 2040.03 कोटी देण्यात आला आहे. रुपये 1.50 लाखावरील रक्कम भरुन एक रकमी परतफेड योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने वेळोवेळी मुदत वाढ दिली आहे. आता ही मुदत 31 जून 2019 अखेर पर्यंत वाढविण्यात आली आहे. कागदपत्रांची छाननी करणे सुरु आहे, कोणताही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही असेही ते म्हणाले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री धनंजय मुंडे, किशोर दराडे आदींनी सहभाग घेतला.