नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मॅडागास्कर मधल्या पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी भारतीय राजदूत अभय कुमार यांनी भारत सरकारच्या वतीनं मॅडागासकरच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना ६०० टन तांदूळ सूपूर्द केले. भारतीय नौदलाच्या शार्दुल या जहाजातून हा तांदूळ १० तारखेला मॅडागास्करला पोहोचला होता.

हे तांदूळ इथे ३० जानेवारीला आलेल्या डायना वादळाने बाधित झालेल्या लोकांमध्ये वाटण्यात येणार आहेत. ३० जानेवारीलाच भारतीय नौदलाच्या ऐरावत या जहाजातून तातडीची वैद्यकीय मदत देण्यात आली होती. मॅडागास्करच्या या आपत्तीकाळात त्यांना मदत पाठवणारा भारत हा पहिला देश आहे.

हिंद महासागरातल्या आपल्या बहिण भावांसाठी भारताने ही मदत पाठवली असल्याचे राजदूत कुमार यावेळी म्हणाले.