पिंपरी : पिंपरी -चिंचवड व पुणे परिसरामध्ये नागरिकांना वाढत्या प्रदूषणाचा सामना करावा लागत असून प्रदुषणामुळे व हवामान बदलामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वन्यजीव वन्यप्राणी व वनस्पती यांना देखील वाढत्या प्रदूषणाचा धोका तयार झाला आहे.

सर्व कारखान्यांना सूचित करुन घनकचरा व दूषित पाणी यांचे शुध्दीकरण करण्याची यंत्रणा सुरु करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनानुसार पिंपरी युवा सेनेच्या वतीने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उद्योग व कारखाने याद्वारे घनकचरा, प्रदूषित पाणी व तयार झालेल्या दूषित पाण्याचे शुध्दीकरण करुनच त्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक असताना कारखाने व उद्योग हे आर्थिक बचत करण्यासाठी कुठल्याही शुध्दीकरण प्रक्रियेशिवाय हे पाणी थेट नदी- नाल्यात सोडून देतात. त्यामुळे जीवसृष्टी व पर्यावरणाची हानी होत आहे. तसेच नागरिकांना त्वचा विकार, श्वसनाचे आजार तसेच कर्करोग यांचे प्रमाण वाढले आहे.

यावेळी युवासेना पुणे जिल्हा समन्वयक रुपेश कदम, पिंपरी विधानसभा युवती सेना अध्यक्षा प्रतिक्षा घुले, विभागसंघटक निलेश हाके, उपविभाग संघटक सनी कड, रवी नगरकर, अजित बोराडे उपस्थित होते.