नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वन विभागानं आदिवासींना, २००६च्या वनहक्क कायद्यानुसार, ते कसत असलेल्या आणि त्यांनी मागणी केलेल्या पूर्ण जमिनीचा अधिकार द्यावा अशी मागणी, राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केली आहे.

पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्याल्या डोंगरवाडी या गावातल्या, वनहक्क मिळालेल्या भूखंड धारकांनी, वृक्ष तोड केल्याचा ठपका ठेवून, वन विभागानं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यासंबंधी पंडित यांनी या भागाचा दौरा करून, वन अधिकारी,कर्मचारी आणि भूखंडधारकांचं म्हणणं आणि अडचणी समजून घेतल्या.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भूखंडधारक आदिवासींना विश्वासात घेऊन यांच्याशी मैत्रीपूर्ण नातं जपायला हवं, तरच वन संरक्षणासाठी बळ मिळेल असंही पंडित यांनी यावेळी सांगितलं.