नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातले उसतोड मजूर परतीच्या मार्गावर आहेत. ऊस तोडणीची व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे यंदाचा गळीत हंगाम आठवडाभरात बंद करण्याचा निर्णय साखर कारखाना चालकांनी घेतला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात २ हजार एकरातला ऊस, गाळपाशिवाय शिल्लक राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ऊस तोड लवकर पूर्ण व्हावी यासाठी सर्व कारखाना चालक हे प्रयत्न करत आहेत. मात्र कोरोना विषाणूच्या भीतीने उसतोड मजूर गावाकडे परतू लागले आहेत. काही मजूर तर आठ दिवसांपूर्वीच आहे त्या स्थितीत काम सोडून गावी निघून गेले आहेत. त्यामुळे अद्याप तोडणी न झालेल्या ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सांगली जिल्ह्यातील दत्त इंडिया, राजारामबापू, हुतात्मा किसन अहिर हे कारखाने अद्याप सुरू आहेत. मात्र मजूर कमी झाल्यामुळे ऊस गाळपाचं काम आटोपतं घ्यावं लागणार आहे.