मुंबई : इमारतीमध्ये अग्निशमन उद्देशाकरिता ठेवण्यात आलेल्या रिफ्युज मजल्याचा गैरवापर होऊ नये तसेच इमारत बांधताना नमुद केलेल्या अटी व शर्तींची पुर्तता करुन अग्निशमन अधिकारी यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. असे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच महानगरपालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागामार्फत भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री. सागर म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इमारतींमध्ये रिफ्युज मजल्याचा अनधिकृत गैरवापर होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास महानगरपालिकेमार्फत त्वरित पाहणी करण्यात येते व महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 मधील कलम 53 मधिल तरतुदीनुसार कारवाई करण्यात येते. महा-रेरा प्राधिकरणामार्फत अधिनियमानुसार विकासकास दंडाचीही तरतूद करण्यात आलेली आहे.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री किरण पावसकर, शरद रणपिसे, जयंत पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.