नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर दोन टक्के व्याज सवलत, आणि तीन टक्के तत्पर कर्जफेड प्रोत्साहन योजनेला, येत्या३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं काल घेतला.

चार टक्के व्याज दरानं, तीन लाख रूपयांपर्यंत पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येतं. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांवर, बँकापर्यंत पोहाचण्यासाठी तसंच त्यांच्या शेतमालाच्या विक्रीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे ते वेळेत कर्जाची परतफेड करू शकलेले नाहीत, ही बाब लक्षात घेऊन, ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुदतवाढ दिलेल्या कालावधीसाठी, बँका शेतकऱ्यांना कोणताही दंड आकारणार नाहीत. सरकार शेतकऱ्यांना दोन टक्के व्याज सवलत, आणि तत्पर कर्जफेड केल्यास, अतिरिक्त तीन टक्के व्याज सवलत देऊन पीक कर्जाचा पुरवठा करते.