राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३०२ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : कोरोना निदानासाठी देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे विस्तार करण्यात आला असून आयसीएमआरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी सिद्ध झाल्या आहेत. यातील खाजगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत. आज राज्यात एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत, १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ अहमदनगरचे आणि २ बुलढाणा येथील आहेत. आतापर्यंत ३९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :-

मुंबई                                                      १५१

पुणे ( शहर व ग्रामीण भाग )                        ४८

सांगली                                               २५

मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा ३६

नागपूर                                        १६

यवतमाळ                                     ४

अहमदनगर                                    ८

बुलढाणा                       ३

सातारा, कोल्हापूर           प्रत्येकी  २

औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी  १

इतर राज्य – गुजरात १

एकूण ३०२ त्यापैकी ३९ जणांना घरी सोडले तर १० जणांचा मृत्यू

राज्यात आज एकूण ४०६ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.   आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ हजार ३३१ नमुन्यांपैकी ५ हजार ७८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३९ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २३ हजार ९१३  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १४३४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.