मुंबई, : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी भावाने हरभरा खरेदीसाठी दि. 1 मार्च पासून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि.23 मार्चच्या मध्यरात्रीपासून दि.24 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे.  तसेच राज्यात  कलम 144 नुसार दि.22 मार्च पासून संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हरभरा नोंदणीसाठी अडचणी आहेत. यामुळे राज्यात केवळ 1,36,879 इतकेच शेतकरी नोंदणी करू शकले.  शेतकरी हमी भावाच्या खरेदी पासून वंचित राहु नये यासाठी हरभरा खरेदीकरिता नोंदणी कालावधी 30 दिवसाने वाढविण्यात आला आहे. त्यानुसार शेतकरी 30 एप्रिल 2020 पर्यंत नोदणी करू शकतील, असे पणन विभागाच्या उपसचिवांनी कळविले आहे.