नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला गेल्याची माहिती लपवल्याप्रकरणी १५० जणांवर मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनी माहिती न लपविता समोर येऊन महानगरपालिकेला हेल्पलाईन आधारे कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते. अन्यथा वेगवेगळ्या कलमांतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला होता.

साथीचा रोग पसरवायला मदत केल्याबद्दल, तसंच माहिती लपवल्याबद्दल महापालिकेच्यावतीने अग्निशमन दलाने हा गुन्हा दाखल केला आहे.

नांदेड पोलीसांनी आज इंडोनेशियातल्या दहा आणि दिल्लीतील दोन अशा एकूण बारा व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. या सर्वांविरूध्द पोलिसांनी नांदेडच्या ईतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमानंतर १५ मार्चला नांदेडला आले होते आणि इथ आल्याची माहिती त्यांनी लपवली होती.

दरम्यान या कार्यक्रमाला राज्यातले १४०० लोक गेले होते. त्यापैकी ५० जणांनी मोबाइल बंद ठेवला असल्याने त्यांच्याशी अजूनही संपर्क झाला नसल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या लोकांनी स्वतःहून प्रशासनाशी संपर्क साधावा अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.