मुंबई : दुकानदारांनी दक्षता समितीबाबतचे फलक, तसेच आपल्या दुकानात असलेला अन्नसाठा यासंदर्भातील फलक लावणे अनिवार्य आहे. ज्या दुकानदारांनी याबाबत कार्यवाही केली नाही त्यांनी येत्या आठ दिवसांत दर्शनी भागात फलक लावावेत, असे निर्देश जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष कैलास पगारे यांनी दिले.

नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस परिषदेतील शासकीय आणि अशासकीय सदस्य उपस्थित होते.

श्री.पगारे यावेळी म्हणाले, दुकानदारांबत काही तक्रार असल्यास दक्षता समितीला संपर्क करुन त्यांना याबाबत सांगणे आवश्यक आहे. याशिवाय नियंत्रक शिधावाटप आणि नागरी पुरवठा विभागाकडे येत असलेल्या तक्रारींवर विभागामार्फत तोडगा काढणे आवश्यक असल्याने याबाबत संबंधित यंत्रणांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.

बैठकीदरम्यान श्री.पगारे यांच्या हस्ते जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांना ओळखपत्रे देण्यात आली. श्री.पगारे यांनी कार्यालयनिहाय प्राप्त तक्रारींचा आढावा घेतला.