मुंबई : कोविड-19 विरोधात लढा देतानाच फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या, द्वेषमुलक वक्तव्य आणि अफवा पसरवणाऱ्याविरोधातल्या लढ्यालाही केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. कॅबिनेट सचिव आणि केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून, त्यांनी फेक न्यूज विरोधी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र पोलीस, राज्यात, सायबर कायद्याची तत्परतेने अंमलबजावणी करत असून, व्हाटस अॅप ग्रुप एडमीन आणि सदस्यांनी कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात, ‘काय  करावे आणि काय करू नये’ याबाबत गेल्या आठवड्यात सूचनावली जारी केली आहे.

लॉक डाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत, महाराष्ट्र सायबर शाखेने, सोशल मिडीयावर, फेक न्यूज, अफवा आणि द्वेषमुलक वक्तव्य करण्याविरोधात 161 गुन्हे नोंदवले आहेत. बीड मधे सर्वात जास्त म्हणजे 22 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर कोल्हापूर 13, पुणे ग्रामीण 12, मुंबई 11 आणि जळगावला 10 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

कोविड-19 आणि त्याच्या उपचाराबाबत प्रामुख्याने अफवा पसरवल्या जात असल्याचे आढळले. सोशल मिडीयावर द्वेषमुलक वक्तव्याकडेही वाढता कल दिसून आला असून यासंदर्भात, 73  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 39 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गेल्या 48 तासात, महाराष्ट्रात, कोरोना महामारीबाबत, सोशल मिडिया आणि इतर ऑनलाइन मेसेज चॅनेलवर फेक न्यूज, द्वेषमुलक वक्तव्य आणि अफवा पसरवणे यासंदर्भात 30 प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आले. व्हाटस अॅप, फेस बुक आणि टिक टॉक यांचा यासाठी बऱ्याचदा दुरुपयोग केला जात आहे.

सोशल मिडीयावर फेक न्यूज, द्वेषमुलक वक्तव्य आणि अफवा पसरवणे याबाबत जनतेला जागरुक आणि सतर्क, करण्यासाठी सायबर पोलीस प्रयत्न करत असून, प्रत्येक जिल्ह्याच्या सोशल मिडिया हँडलद्वारे जनतेपर्यंत पोहोचत आहेत. फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी, प्लॅटफॉर्म सूचित करण्यात येत आहेत.
सायबर पोलिसांनी जनतेला सूचना केल्या आहेत-

  • फेक न्यूज आणि अफवा फॉरवर्ड करू नका,त्याची प्रसार साखळी खंडीत करा.
  • अफवा निर्माण करणाऱ्यांना ओळखून त्यांची जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा सायबर विभागाला माहिती द्या
  • कोणतेही वृत्त  किंवा माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी किंवा शेअर करण्यापूर्वी त्यातल्या बाबीचे तथ्य पडताळून पहा.
  • अशा काळात  खात्रीशीर माहितीसाठी नेहमीच अधिकृत सूत्रांकडूनच माहिती घ्या