नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळात विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना मनरेगासह, कृषी, औद्योगिक, उत्पादन, आणि बांधकाम व्यवसायाअंतर्गत सुरू होणाऱ्या कामांमध्ये सहभागी करून घेताना, त्यांची ये-जा करण्यासंदर्भात, केंद्रीय गृहमंत्रालयानं आज मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. त्यानुसार या मजुरांची केवळ ते आहेत त्या राज्यांतर्गतच ये – जा होऊ शकते, त्यांना राज्यांची सीमा ओलांडायची परवानगी नसेल.

कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी या मजुरांची तपासणी केल्यानंतर आजाराची कोणतीही लक्षणं नसलेल्याच मजुरांनांच कामावर जाता येईल. या मजुरांच्या प्रवासाठीच्या बसचं निर्जंतुकीकरण करणं, बसमध्ये सामाजिक सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल. प्रवासादरम्यान मजुरांच्या खाण्या आणि पाण्याची सोय स्थानिक प्राधिकरणांना करावी लागणार आहे.