नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांपासून एकही नवा कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. देशात असे एकूण ६१ जिल्हे असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
रक्ताची गरज असलेल्या व्यक्तींसाठी केंद्र सरकारने हेल्पलाइन सुरू केली आहे.  या व्यक्ती ९३-१९-९८-२१-०४, ९३-१९-९८-२१-०५ या क्रमांकावर रक्ताची गरज नोंदवू शकता. रक्तदान करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनीही या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
देशात गेल्या 24 तासात कोविड 19 मुळे 47 जणांचा मृत्यू झाला, तर 1 हजार 336 नवे रुग्ण आढळले. देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18 हजार 601 झाली असून 590 रुग्ण मरण पावले.
राज्यात काल आणखी 472 नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यातला एकूण रुग्णांचा आकडा 4 हजार 676 झाला आहे. तर मुंबई महानगर क्षेत्रातल्या या विषाणू संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ६०७ झाली आहे. या आजारानं राज्यात काल नऊ जणांचा मृत्यू झाल्यामुळं मृतांची एकूण संख्या 232 झाली आहे.
मुंबईतल्या प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या गेल्या १० दिवसात ४३२ ने वाढली आहे. सध्या मुंबईत सुमारे ८१३ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. यापैकी सर्वाधिक ८२ क्षेत्र ही हाजी अली ते वरळी या भागात असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे.
या आजारातून देशातले एकूण 3 हजार 252 रुग्ण बरे झाले असून काल दिवसभरात तब्बल ७५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण साडे सतरा टक्के असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.